आखाती देश, युरोप, अमेरिकेत हापूस आंब्याला मोठी मागणी, आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी व्यक्त केले समाधान
परराज्यातील आंबा हापूसच्या नावाखाली विकल्याने कोकणातील हापूसची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बदनामी होतेय :- आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी व्यक्त केली चिंता
खराब हवामानाचा आंबा उत्पादनाला फटका, कोकणातील आंबा बागायतदार,शेतकरी संकटात
रायगड (धम्मशील सावंत ) रायगडसह कोकणच्या हापूस आंब्याच्या चवीचा मोह जगाला पडतो. कोकणचा हापूस आंबा त्याच्या उत्तम चवीसाठी व अप्रतिम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध असलेल्या कोकणच्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढे सद्यस्थितीत अनेक संकट उभी ठाकली आहेत. कोकणातील शेतकरी बॉण्ड फायटर असल्याने तो हवामानबदल,अस्मानी, नैसर्गिक संकटात देखील पुन्हा जिद्धीने उभा राहतो. हा शेतकरी आत्महत्या करीत नाही.
कोव्हिड जगावर आलेली आपत्ती होती, मात्र या आपत्तीत आम्ही संधी शोधली, नैसर्गिक आपत्तीत ही आम्ही थांबलो नाही, राज्याच्या कानाकोपऱ्यात आम्ही आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहचवला. यामध्ये तत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी यांची परवानग्या मिळवून द्यायला मदत झाली. अशावेळी सरकारकडून आंबा बागायतदाराला आवश्यक ती मदत ही मिळत नाही. ही शोकांतिका आहे.

निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते वादळात आमची झाडे मोडून पडली मोठे नुकसान झाले. यातूनही आम्ही नवे विश्व, संधी आणि क्षितिज शोधले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हेक्टरी 50 हजार, प्रमाणे 2 हेक्टर मागे 1 लाख रुपये मदत वाढवून आम्हा बागायतदार यांना मोठा दिलासा दिला. असे जांभूळपाडा अलिबाग येथील आंबा बागायतदार संदेश पाटील म्हणाले.
सध्या परकीय आंब्याचे हापुसच्या नावाखाली होत असलेले अतिक्रमण चिंतेची बाब असून याकारणाने शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, ग्राहकांची फसवणूक होतेय, आणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापुसचे नाव बदनाम होत आहे. हे थांबलं पाहिजे. कोकणच्या हापुसचे वैशिष्ट्य आणी गुणधर्म हापुसचा रंग, सुगंध आणी चव यावरून ओळखता येतो.
कोकणचा हापूस आंबा जागतीक बाजारपेठेत पोहचला याचा आनंद आणी समाधान असल्याचे आंबा बागायतदार संदेश पाटील म्हणाले. संदेश पाटील पुढे म्हणाले की कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या ठिकाणी हापूस चे उत्पादन होते. यावर्षीचा विचार केला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूसचे उत्पादन अधिक आहे, तर अन्य जिल्ह्यात आंबा उत्पादनात घट झाली आहे.

रायगडमध्ये 30 टक्के पेक्षा उत्पादन कमी आहेत. सध्या कीटक आणि रोगाचा प्रादुर्भाव अधिक परिणामकारक ठरत आहे. अनेक वर्षे करीत असलेल्या फवारण्या , रोग प्रतिबंधात्मक उपाय करतो, मात्र आता किटकात प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे दिसते. फुलकीड ही छोटीशी कीड असून ती प्रचंड नुकसान करते. फवारणीचा सर्वाधिक खर्च फुल किड्यांवर नियंत्रण आणण्यासाठी होतो. यावर्षी कोकणातील पाचही जिल्ह्यात फुलकिड्याने आंबा बागायती व्यापल्या आहेत.
प्रशासनाला, कृषी विभागाला सूचना देऊन ही कोणतीही कृती दिसत नाही. त्यामुळे आंबा बागायतदार संकटात आहेत. खराब हवामानाचा, उष्णतेचा आंबा उत्पादनाला फटका बसला असून कोकणातील आंबा बागायतदार संकटात असल्याचे दिसत आहे. कोकणातील पाच जिल्ह्यात जो आंबा पिकतो, तोच हापूस आंबा आहे. इतर ठिकाणचा आंबा हापूस नाही.

