शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाशभाऊ देसाई यांचा विश्वास
सुनिल तटकरे केंद्रात मंत्री होऊन कोकणाच्या विकासाला प्रचंड चालना देतील- प्रकाशभाऊ देसाई यांचा विश्वास,
जनतेने सुनिल तटकरे यांच्या रूपाने विकासाला कौल दिला- प्रकाशभाऊ देसाई,
रायगड .(धम्मशील सावंत)रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना जनतेने विकासाच्या मुद्द्याला प्रथम प्राधान्य देत भरभरून मतांनी निवडून देऊन संसदेत नेतृत्व करण्यास पुन्हा एकदा संधी दिली. जनतेने सुनिल तटकरे यांच्या रूपाने विकासाला कौल दिला आहे.
सुनिल तटकरे यांच्यासारख्या अभ्यासू,सक्षम, आणि अफाट विकासदृष्टी असलेल्या नेत्याला केंद्रीय मंत्री पदाची संधी नक्की मिळेल, येत्या काळात भारत सरकारमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री होऊन मिळालेल्या संधीचे सोने करून ते कोकणाच्या सर्वांगीण, शाश्वत विकासाला भरभरून चालना देतील असा भरभक्कम विश्वास शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाशभाऊ देसाई यांनी व्यक्त केला.
याचबरोबर कोकणातील महायुती संघटनात्मक दृष्ट्या आता भक्कम होईलच, याहीपुढे रायगड कोकणातील विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वात जिंकल्या जातील असेही देसाई म्हणाले. सुनिल तटकरेंच्या रूपाने कोकणाच्या विकासाची चाके गतीने फिरतीलच, शिवाय प्रदूषण विरहित आणि पर्यावरण पूरक प्रकल्प स्थापित होऊन सुशिक्षित बेरोजगार तरुण, आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी देखील प्राप्त होतील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

प्रकाश देसाई यांनी म्हटले आहे की राजकारणात कधीही कोणीही कुणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो हेच खरे. रायगडात असेच कालचक्र फिरले आहे, एकेकाळी सुनिल तटकरे यांच्या सोबत त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले महेंद्र दळवी, प्रकाश देसाई, राजीव साबळे यांच्यासारखे अनेक नेते , पदाधिकारी मधल्या काळात अन्य पक्षात स्थिरावले खरे, मात्र पुन्हा सारेच जण तटकरे यांच्या निर्विवाद नेतृत्वात पुन्हा महायुतीच्या माध्यमातून एकत्रित आले.
हे कालचक्र विकास या संकल्पनेला घट्ट बिलगणारे आहे. रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार रविशेठ पाटील, आमदार योगेश कदम या चारही आमदारांनी सुनिल तटकरे यांच्या विजयासाठी अपार मेहनत घेतली, त्यांनी दिलेला शब्द पाळत आपापल्या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य देऊन महायुतीचा धर्म पाळला.
आता येणारी विधानसभा निवडणूक देखील महायुतीच्या माध्यमातून लढवली जावी आणि पुन्हा महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध करणे अपेक्षित आहे. असे देसाई म्हणाले. पक्षसंघटना बलाढ्य व मजबूत कशी होईल याला आपण नेहमीच महत्व देत आलो आहोत, छोट्या मोठ्या गटबाजीला मी भीक घालत नाही असे श्री देसाई म्हणाले.
ज्याच्या मध्ये संघटनकौशल्य असते, नेतृत्व गुण असतात, त्याच्याच मागे जनमत आणि लोकमत आहे, तोच खरा पदाधिकारी आणि नेता म्हणून नावलौकिक मिळवतो. स्वयंघोषित नेता कधीच नेता होऊ शकत नाही हे या निवडणुकीत सिद्ध झाले असल्याचा टोला प्रकाश देसाई यांनी लगावला. देसाई पुढे म्हणाले की रायगड- रत्नागिरी असो अथवा रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघ असो येथील जनता सुज्ञ आहे.
