नवी दिल्ली: NEET-UG परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशातील युवकांना उद्देशून एक सविस्तर आणि भावनिक खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात त्यांनी NEET परीक्षेतील अनियमिततेची नैतिक जबाबदारी स्वीकारत विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षणव्यवस्थेतील पारदर्शकता आणि देशाच्या लोकशाही मूल्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी पत्राच्या सुरुवातीलाच गेली चार दशके विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणांसाठी कार्यरत असल्याचे सांगितले. सक्षम, समावेशक आणि पारदर्शक शिक्षणव्यवस्था ही विकसित भारताचा मजबूत पाया असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
NEET-UG परीक्षा गैरव्यवहारानंतर सरकारची तातडीची कारवाई
पत्रात त्यांनी नमूद केले की, 3 मे 2026 रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत अनियमितता समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने चौकशी सीबीआयकडे सोपवली. त्यानंतर परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील वर्षापासून NEET परीक्षा कॉम्प्युटर-बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेण्याचा निर्णयही झाल्याचे त्यांनी सांगितले.
20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रयत्न
धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, 20 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा कोणताही अडथळा न येता पार पडावी यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन तसेच पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने व्यापक स्तरावर काम करण्यात आले. 21 जून 2026 रोजी परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘मी जबाबदारीपासून कधीही पळालो नाही’
NEET प्रकरण समोर आल्यानंतर पहिल्याच दिवसापासून आपण जबाबदारी स्वीकारली असून कोणत्याही परिस्थितीपासून दूर पळालो नाही, असे प्रधान यांनी स्पष्ट केले. कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये आणि परीक्षा माफियामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये, हा आपला ठाम निर्धार असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
‘विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली, मन व्यथित झाले’
गेल्या काही दिवसांत काही जबाबदार व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत त्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. भारताची युवा शक्ती ही देशाची खरी ताकद असून त्यांना संभ्रम आणि संघर्षाच्या भोवऱ्यात अडकवले जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजीनाम्यामागचे कारण स्पष्ट
जंतर-मंतरसह देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा राष्ट्रविरोधी शक्तींनी घेऊ नये, विद्यार्थ्यांचे भविष्य न्यायालयीन प्रक्रियेत अडकू नये आणि त्यांनी पुन्हा शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, या विचारातून आपण पंतप्रधानांकडे राजीनामा सादर केल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांचे मानले आभार
पत्राच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्रिमंडळातील सहकारी, शिक्षण मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. राष्ट्रसेवा हीच आपल्या आयुष्यातील सर्वोच्च प्राथमिकता असून देशातील युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भविष्यातही आपण कार्यरत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
