Ahilyadevi Holkar I प्रजेसाठी धड़पड़णाऱ्या अहिल्यादेवी

 

अहिल्यादेवी स्वतंत्र भारतातील, माळव्याच्या “तत्त्वज्ञानी महाराणी” म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मृत्युपर्यंत त्या तिथेच वास्तव्यात होत्या. मल्हाररावांनी त्यांना आधीच प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केल्यामुळे त्या धाडसी बनल्या होत्या. त्यामुळे त्या लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.
अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर कुम्हटेच्या लढाईत मृत्यु पावल्यानंतर त्याकाळी सती जाण्याची प्रथा अस्तित्वात होती. परंतु सासरे मल्हारराव होळकर यांनी विरोध केला. साम्राज्याचा कारभार सांभाळावा असे त्यांनी सुचविले.

माळवा प्रांताचा कारभार बघत असतांना सासरे मल्हारराव होळकर यांचे देखील दु:खद निधन झाले. 1765 मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाई दरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते. “चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा, तेथे तुम्ही 4-5 दिवस मुक्काम करू शकता. तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांच्या शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा…..कूच करतांना, मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा”
पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्य कारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते.

अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.
अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला, तो एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली.

ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्यादेवी ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. तिच्या चांगल्या बुध्दिचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्यादेवी ही एक महान स्त्री होती.
आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती.

अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्यादेवींना “तत्त्वज्ञानी राणी” असे संबोधतात. याचा संदर्भ बहुतेक “तत्त्वज्ञानी राजा” भोज यांच्याशी असावा.
अहिल्यादेवी होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. 1772 मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे. वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती व युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते.

सरळ त्याच्या चेहऱ्यावर वार केल्यावरच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते, असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.
भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा ‘कर’ घेण्याचा अधिकार दिला. यासाठी रायगंण सुभ्यावर नवापुर या ठिकाणी ठिंगळे भिल्ल सरदार यांना नेमले. त्यामुळे भिल्ल जमाती होळकराच्या सैन्यात आले व त्यांनी सुरते वर वचक बसवला.

याही बाबतीत, (आंग्ल लेखक) “माल्कम” यांच्यानुसार, अहिल्यादेवींनी त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले.
एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्याकाळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.

राजकारणातील बारकावे व तत्त्व व्यावहारिक नीती नियम व सूत्रे आपल्या देशाची राजकीय, सामाजिक, भौगोलिक स्थिती, रणांगणावरील आखाडे व अडचणी आणि बारकावे समजून घेतले. मल्हारराव यांच्या गैरहजेरीत सर्व कारभार करण्यात त्या पारंगत झाल्या. शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले.
मातोश्रीची लोककल्याणाची कीर्ती ख्याती ऐकुन अनेक विद्वान लोक त्यांची भेट घेण्यास येत असत आणि नंतर त्या ठिकाणीच राहत असत. अनेक विषयाचे विद्वान, शास्त्री पंडीत, व्याकरणकार, कीर्तनकार, ज्योतिषी, पुजारी, वैद्य, हकीम यांनाही त्या मुद्दाम बोलावून घेऊन त्यांना त्या राजाश्रय देत असत.

महेश्वर नगरीत वास्तव करीत होते म्हणूनच महेश्वर नगरी त्याकाळी संस्कृती विद्वान व धर्माचे माहेरघर म्हणून नावारूपाला आली होती . ग्रंथ संपंदा- निर्मिती छापखाने नसल्याने त्याकाळी धर्माचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याकरिता हस्तलिखिते वरच अवलंबून राहावे लागत होते. हस्तलिखिते लिहिणारे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करत असत.

ज्याप्रमाणे हिरा व रत्ने पारखणाऱ्या जवाहिऱ्याप्रमाणे त्या विद्द्येची महत्त्व जाणत असल्याने त्यांच्या मागणीप्रमाणे रक्कम देऊन ग्रंथाची हस्तलिखिते तयार करून विद्वान विद्यार्थ्यांसाठी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करून जतन केली. शाळा काढून विद्याप्रसाराचे काम केले.
या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती. सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा समज समाजात रूढ होता.

रामायण आणि महाभारत यामध्ये अनेक युद्ध होऊनही कोणी सती गेल्याचा उल्लेख नाहीत असे अनेक दाखले देऊन सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही हे प्रजेला पटवून दिले. कालांतराने 1829 साली राजाराम मोहन रॉय यांचा प्रयत्नामुळे सतीची अनिष्ट प्रथा कायद्याने बंद करण्यात आली.

यावरून अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृष्टतेची प्रचीती आपणांस येते. त्याकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत अशा लुटारू लोकांना ठिंगळे सरदारांमार्फत सैन्यात सामील करून पाळीव पशु व गायी, म्हशी आणि शेत जमीनी दिल्या व त्यांचे मत परिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला.

भिल्ल लोकांना भिलकवाडी कर घेण्याची परवानगी दिली. एवढे करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा नर्माण केला.
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, यवढेच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखलं प्रसिंध्द हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले.

त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोकं या देवळालाही भेट देतात.

अहिल्याबाईंना प्रजेसाठी कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती. अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता. त्यांच्या संस्थानचा सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्याला तुरुंगात डांबले. तर अहिल्यादेवीच्या सर्वांना समान न्याय या विचाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा प्रभावित होते.
पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होता, त्यास चाकरीत घेऊन तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत.

भारतीय संस्कृती कोषात अहिल्यादेवीनी केलेल्या बांधकामांची यादी आहे – काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

अहिल्यादेवींनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. त्यांच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याचा मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः आयोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा अहेर दिला.
अहिल्यादेवींच्या सन्मानाप्रित्यर्थ व स्मृतिप्रित्यर्थ भारत सरकारने 25 ऑगस्ट 1996 रोजी एक टपाल तिकिट जारी केले. या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव “देवी अहिल्याबाई विमानतळ” असे ठेवण्यात आले आहे. तसेच, इंदूर विद्यापीठास “देवी अहिल्या विश्वविद्यालय” असे नांव देण्यात आले आहे.

इंदूर शहराला सर्व सोयीने उपयुक्त प्रगतिशील असे शहर बनविले. महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाचे नवीन नाव “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ” ठेवण्यात आले आहे. 1996 मध्ये, इंदुरातील नागरिकांनी त्यांच्या नावाने अहिल्यादेवी स्मृतीस अभिवादन म्हणुन पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार महान समाजधुरिण नानाजी देशमुखांना दिला.
अशा सोज्वळ, न्यायप्रिय अहिल्यादेवींना इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी भारताच्या “कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट” असे म्हटले आहे. थोडक्यात अहिल्याबाई यांची रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी तुलना केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रीयांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांचे नांव सर्व प्रथम लिहिले जाईल.

ही त्यांच्या चांगुलपणाची पावती म्हणायला हरकत नाही.
या इंदूरमधील शासकांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की, ते कडकपणे हाताळले जाई.

अहिल्यादेवींना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब, घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते.

बऱ्याच काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची ने-आण करत असतांना चोर व दरोडेखोर त्यांची लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी भिल्ल लोकांना त्यापासून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्यादेवी आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करीत असे.

प्रविण बागडे
नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com
—————————————

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *